होळीची गाथा
पुढच्या आठवड्यात या वर्षीचा वेदिक पंचांगानुसार शेवटचा सण इंग्रजी पंचांगानुसार दुसरा सण ‘होळी’ आपण साजरा करणार आहोत. कैक वर्षे आपण होळीच्या दिवशी संध्याकाळी काही लाकडे जमवून होलिका दहन करतो पण त्याच्या मागचं कारण कधी जाणून घेतलं नाही. चला तर जाणून घेऊया हा सण आपण कशासाठी आणि कशा पद्धतीने साजरा करावा.
‘होलिका दहन’ या सणामागे कहाणी आहे ती राजा हिरण्यकश्यपू आणि त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद यांची. राजा हिरण्यकश्यपूने देवाकडून आगळे वेगळे वरदान मागून घेतले की ‘त्याला ना शास्त्राने ना अस्त्राने, ना घरात ना घराबाहेर, ना सकाळी न संध्याकाळी, मनुष्यच्या किंवा कुठल्याही ही जनावराच्या हातून मरण येणार नाही.’ या वरदानामुळे राजा हिरण्यकश्यपू स्वतःला देवत्व मिळाल्या सारखा वागू लागला. जे त्याची पूजा करणार नाही त्याच्यावर अत्याचार करू लागला.
सगळ्यात अवघड गोष्ट अशी घडली की, त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद, त्याला वडिलांचे हे देवत्व मान्य नव्हते, तो विष्णू भक्त होता. तो सतत विष्णू देवाचे नामस्मरण करत असे. ज्यामुळे राजा हिरण्यकश्यपूला खूप चीड येऊ लागली. त्यांनी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, दमदाटी करून बघितली, हर तऱ्हेने मुलाला स्वतः समोर नामावण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतु भक्त प्रल्हाद हा निडरतेने आणि अखंडपणे विष्णू देवाची आराधना करत राहिला. जेव्हा राजाला कळून चुकले की भक्त प्रल्हादावर कशाचाच परिणाम होत नाही आणि तो आपले देवत्व मान्य करत नाही, तेव्हा रागा पोटी त्याने स्वतःच्या मुलाचा बळी द्यायचा विचार केला. परंतु त्याचे ते प्रयत्नही निष्फळ ठरले. भक्त प्रल्हाद इतका एकनिष्ठ आणि सच्चा भक्त होता की त्याच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचे विष्णू देवाने रक्षण केले आणि त्याला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढले.
हे सर्व पाहून राजा हिरण्यकश्यपू अतिशय संतप्त मनाने स्वतःच्या बहिणीला बोलावून घेतले. तिचे नाव होते ‘होलिका’, तिला सुद्धा एक वरदान मिळाले होते. वरदान असे होते की तिला अग्नीचा दाह जाणवणार नाही किंवा अग्नीशी संपर्क झाला तरीही ती सुरक्षित राहील. राजाने तिला आदेश दिला की तिने भक्त प्रल्हादला स्वतःजवळ बोलावून मांडीत बसवावे म्हणजे आजूबाजूला लाकडे रचून आग लावण्यात येईल आणि होलीका स्वतः भक्त प्रल्हादला त्या आगीमध्ये धरून ठेवण्यात यशस्वी होईल, या रीतीने भक्त प्रल्हादचा अंत होईल.
परंतु झाले भलतेच, या कटातून सुद्धा विष्णु देवाने भक्त प्रल्हादची सुखरूप सुटका केली आणि याच आगीमध्ये होलिका मात्र जळून खाक झाली. वरदान असा होता की जर आगीमध्ये ती एकटी असेल तर तिला काहीही होणार नाही, परंतु जर तिने त्या आगीमध्ये अजून कुणाला सहभागी केले असेल तर मात्र या वरदानाचा उपयोग होणार नाही, पण याबद्दल तिला संपूर्ण माहिती नव्हती.
या घटनेचे प्रतीक म्हणून होलिका दहन हे प्रचलित झाले दर वर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ता नंतर होलिका दहनाचा कार्यक्रम सर्वत्र साजरा केला जातो. होलीका दहनासाठी लाकूड, गौर्या, वाळलेले गवत इत्यादी जळू शकणारे साहित्य एकत्र करून त्यामध्ये दोन आकृत्या ठेवल्या जातात. एक आकृती जळू शकेल अशा कुठल्याही वस्तू पासून बनवले जाते जी होलीकाचे प्रतीक असतेआणि दुसरी मुर्ती भक्त प्रल्हादाचे प्रतीक असते, ही मूर्ती मात्र जळून नाश होणार नाही अशा गोष्टींपासून बनवलेली असते. महाराष्ट्रामध्ये या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. या दिवशी होली के समोर लहान मुले टिमकी वाजवतात, मोठी माणसे जमतात आणि तोंडाने आवाज काढत, उलटा हात तोंडावर ठेवून बोंब मारणे, एकमेकांबद्दल मनात असलेले वितुष्ट होली के समोर बोलून शत्रुत्व कायमचे नष्ट करणे, अशा रूढी प्रचलित आहेत.
दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. दुसऱ्या दिवशी जेव्हा ही होलिका संपूर्णपणे जळून नंतर शांत झालेली असते, तेव्हा खाली त्याची राख उरते. ही राख सर्वजण मिळून एकमेकांना लावतात, अंगाला फासतात, याचे कारण ऋतूत होणारा बदल. असा एक समज आहे की ही राख अंगाला फासली असता येणाऱ्या ग्रीष्म ऋतू मध्ये (उन्हाळ्या मध्ये) अंगावर घामोळे येण्याचे प्रमाण खूप कमी होते. परंतु आधुनिक युगात ह्याच धुळवडीची जागा विविध रंगाच्या रासायनिक किंवा ऑरगॅनिक रंगांनी घेतली आहे.
Copyright © 2025 Vedik Astrologer | Powered by MI Tech Solutions