आपण नेहमी ऐकतो कि ह्या माणसाला मंगळाची दशा चालू आहे, तिला शनीची दशा चालू आहे. पण म्हणजे नेमका काय असत हे दशा वगैरे? ह्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो? सगळ्यांनाच दशा असते का? दशा म्हणजे वाईटच होणार का? हे आणि असे असंख्य प्रश्न आपल्या मनाला शिवून जातात, पण समजेल अशी उत्तर मिळत नाहीत.
चला तर बघूया काय असत हे दशा प्रकरण…..
मानवी जीवनातील अवस्थेला दशा म्हणले जाते. ज्योतिष शास्त्रात दशा ह्या एकूण ३२ प्रकारच्या असतात. पण त्यातील विमशोत्तरी, योगिनी, अष्टोत्तरी, चर, ई. ठराविकच प्रकार वापरले जातात. त्यापैकी सगळ्यात जास्त वापरली जाणारी आणि सर्व सामान्यांना पण माहित असणारी दशा पद्धती म्हणजे विमशोत्तरी महादशा होय.
विमश म्हणजे वीस (२०), उत्तर म्हणजे नंतर, विमश + उत्तर = विमशोत्तर, म्हणजे च्यानंतर वीस (२०). वैदिक शास्त्रात जेव्हा कितीच्या पुढे हे लिहिले नसेल तेंव्हा मूलभूत रित्या १०० आकडा धरण्याचा नियम आहे. म्हणजेच १०० च्या पुढे २० = १२०. म्हणून एकूण विमशोत्तरी हि १२० वर्षांची असते. कलियुगाच्या काळात मानवाचे आयुष्य हे जास्तीतजास्त १२० वर्षांचे मानले जाते. (ह्याला एखादा एवढी असू शकतो)
दशा हि पृथ्वीवर जन्म घेतलेल्या प्रत्येक मानवास जन्म घेतल्या क्षणापासून शेवटच्या श्वासा पर्यंत असते.
विमशोत्तरी महादशे मध्ये जीवनाच्या प्रत्येक अवस्थेतील दशा हि ५ भागांमध्ये विभागलेली आहे. ज्या भागाचा जास्त काळ जीवनावर प्रभाव ती महादशा (१ला भाग) आणि ज्या भागाचा सगळ्यात कमी काळासाठी प्रभाव असेल ती प्राण दशा (५वा भाग).
ह्या प्रमाणे दशेचे ५ भाग होतात महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतरदशा, सूक्ष्मदशा आणि प्राण दशा. नवग्रहांनी हा काळ असमान वाटून घेतला आहे. प्रत्येक ग्रह विशिष्ठ काळासाठी प्रत्येक मानवाच्या आयुष्य नियंत्रित करत असतो. हेच नवग्रह पाचही थरांमध्ये आळीपाळीने येत असतात.
फरक एवढाच आहे कि एखादा ग्रह जेंव्हा महादशे मध्ये पहिल्या भागात असतो तेंव्हा तो काही विशिष्ठ वर्षांसाठी नियंत्रित करत असतो. जेंव्हा तो दुसऱ्या भागात असेल तेंव्हा तो पहिल्या पेक्षा कमी वर्षांसाठी असतो. तिसऱ्या थरा मध्ये तो काही महिन्यांसाठीच असतो. चौथ्या थरा मध्ये तो काही आठवड्यांसाठी किंवा दिवसांसाठी असेल तर शेवटच्या आणि पाचव्या भागात तो फक्त काही तासांसाठी किंवा काही मिनिटांसाठी नियंत्रण करत असतो.
अता दशा म्हणलं कि सगळ्यांना वाईटच विचार मनात येतो, पण तस नसतं. प्रत्येक भागातील ग्रह कुंडलीतील १२ घरांपैकी ज्या घरात (भावात) बसला असेल त्या घराशी संबंधित फळे तो देत असतो. सगळ्यात जास्त सक्रियता हि महादशेचा ग्रह (१ल्या भागातला) ज्या ठिकाणी तुमच्या कुंडलीत असेल त्या घरासाठी जाणवेल, त्याच्या खालोखाल अंतर्दशेचा ग्रह जेथे असेल त्या घरासंबंधी, ह्याच पद्धतीने इतर तीनही भागांचे ग्रह देखील सक्रिय असतात.
महादशेचा मुख्य उपयोग आयुष्यात घडलेल्या किंवा घडणाऱ्या घटनांचा काळ ओळखणासाठी केला जातो. लग्न कधी होईल, नोकरी कधी लागेल, ई. कधी प्रश्नांचे उत्तर दशा पद्धतीत मिळते.
तुमच्या पत्रिके प्रमाणे ज्या ग्रहाची महादशा सुरु असेल तो ग्रह जर चांगल्या ठिकाणी असेल, शुभ फळे देणारा किंवा लाभदायक असेल तर त्या महादाशेच्या काळात जास्त करून तुमचे चांगलेच करतो पण तो ग्रह जर तुमच्या नोकरी किंवा बिझनेसशी संबंधित नसेल तर त्याचा प्रभाव तुम्हाला त्या क्षेत्रात दिसणार नाही. तोच ग्रह जर संततीशी निगडित असेल तर तो तुमच्या संततीशी संबंधित शुभ फळे देईल.
मी आत्ताच म्हणलं जास्त काळ, संपूर्ण काळ का नही म्हणलं बरं? कारण आपण जस सुरवातीलाच पाहिल कि दशा हि ५ भागात वाटली गेली आहे, मग उरलेल्या ४ भागातील ग्रह पण जर तुम्हाला लाभदायक असतीलच असे नाही. त्या मध्ये जर एका भागात तुमच्या पत्रिकेतील हानिकारक ग्रह असेल तर त्या ठराविक काळात तो शुभ फळे देणार नाही.
शेवटी प्रत्येकाने एक गोष्ट नीट लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे, महादशा कोणत्याही ग्रहाची असो, तो ग्रह चांगली फळे देणारा असो वा नसो, हे सर्व काही मर्यादित काळासाठीच आहे. चांगले होत असेल तरीही त्या काळालाही मर्यादा आहे आणि चांगले होत नसेल तरी हि हे लक्षात ठेवा हा काळही मर्यादितच आहे. नंतर दिवस बदलणार आहेतच.
हे सर्वकाही समजण्यासाठी मला एक गमतीशीर उदाहरण सुचल आहे
चित्रपट विश्वा मध्ये ‘अमिताभ बच्चन – द अँग्री यंग मॅन’ हे नाव गेली ५० वर्षे अबाधित आहे. परंतु ह्या काळातच इतरही नट होऊन गेले आणि त्यांनी अमिताभजीं पेक्षा कमी का होईना पण तो काळ जितेंद्र, ऋषी कपूर सारख्या कौटुंबिक भूमिकेतील नटांनी स्वतःच्या नावाने गाजवला. त्या नंतर आले शाहरुख, आमिर सारखे रोमँटिक नट आणि परत प्रत्येकाने आपला काळ गाजवला, पण इथेही अमिताभजी वरचढ होतेच. अता जर मी विवेक मुश्रान हे नाव घेतल तर तुम्हाला एकच चित्रपट आठवेल सौदागर, तो तेवढ्या पुरती प्रसिद्ध झाला आणि लोप पावला. इथेही अमिताभजी होतेच. ह्या सर्व नटांचा काळ कमी अधिक होता पण अमिताभजींचा काळ हा सर्वात मोठा होता. अमिताभजी आले तेंव्हा राज कपूर राजेश खन्ना ह्यांचा काळ होता. पुढे अमिताभजींचा काळ लोप पावेल आणि अक्षय कुमार सारख्यांच्या काळ सुरु होईल आणि हे असेच अविश्रांत सुरूच राहील.
दशा पद्धतीतील ५ भागांचे हि चक्र असेच सुरु राहते. कधी मायेचा ओलावा, कधी पैश्याची भरभराट, कधी बढती आणि स्तुतीचा वर्षाव तर कधी नामुष्कीचा काळ. पण दशा आणि काळ बदलणार हे नक्की.